“गुलालाच्या कीर्तनाने भक्तिरंग; संतसंगाच्या संदेशाने भारावला सप्ताह”
डोंगरशेळकी प्रतिनिधी :
श्री समर्थ धोंडुतात्या महाराज यांच्या ९४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात संतपीठात दुपारी २ ते ५ या वेळेत ह.भ.प. विजयानंद महाराज सुपेकर यांचे गुलालाचे कीर्तन अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले. टाळ-मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या अखंड निनादात व गुलालाच्या उधळणीत संपूर्ण परिसर भक्तिरंगात न्हाऊन निघाला.
या सप्ताहात पारायण व रामकथेची सांगता पार पडली असून अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दि. २२/०३/२०२६ रोजी काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. हे कीर्तन ह.भ.प. जयवंत महाराज बोधले यांच्या वाणीने सादर होणार आहे.
गुलालाचे कीर्तन संपल्यानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच श्री समर्थ धोंडुतात्या महाराज यांच्या समाधीचे पूजन (अभिषेक) ह.भ.प. विजयानंद महाराज सुपेकर यांच्या हस्ते विधीवत पार पडले.
यावेळी सादर करण्यात आलेल्या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने संपूर्ण वातावरण अधिकच भक्तिमय झाले—
देशील तरी पाहे पांडुरंगा ॥१॥
या संतासी निरवीं हेचिं मज देई ।
आणिक दुजें कांहीं न मागों देवा ॥२॥
तुका म्हणे आतां उदार तूं होई ।
मज ठेवी पायीं संताचिया ॥३॥
या अभंगाच्या माध्यमातून संतसंगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. जीवनात धन, मान, सुख यापेक्षा संतांचा सहवास श्रेष्ठ असून त्यांच्या मार्गदर्शनातूनच आत्मशांती व देवप्राप्तीचा मार्ग सापडतो, असा संदेश यावेळी देण्यात आला. त्यामुळे कीर्तनातून केवळ भक्तीचा आनंदच नव्हे, तर जीवनमूल्यांची जाणीवही भाविकांना झाली.
तसेच गावातील सर्व देवतांना नैवेद्य गावचे मानकरी बालाजी पाटील यांनी अर्पण केला. या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.

Post a Comment
0 Comments